जाणून घ्या जैन धर्म व त्यांच्या रूढी परंपरा.

 


जाणून घ्या जैन धर्म व त्यांच्या रूढी परंपरा.

         जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 

      'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. 

         खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला आले असे मानले जाते. जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थंकर यांची परंपरा सांगितली जाते . 

          कथेनुसार वृषभनाथ ( वृषभदेव, आदिनाथ) हे पहिले तीर्थंकर होते तर तेविसावे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ क्षत्रियाप्रमाणेच पार्श्वनाथांचे आरंभीचे जीवन हे सुखकारक होते मात्र पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य वेचले पार्श्वनाथां चा हा काळ सामान्यपणे इसवीसनपूर्व 9 वे शतक मानला जातो.


       भारत हा वेगवेगळ्या प्रदेशांनी नटलेला जसा आहे तसाच तो निरनिराळ्या समुदायांचा सुद्धा देश आहे. भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. प्रत्येकाच्याच काही रूढी परंपरा आहेत.

परंतु संपूर्ण भारतात “अहिंसा परमो धर्म” हा मंत्र जपलेला दिसतो. भारतातले अनेक धर्म, पंथ, समुदाय हे शाकाहारी आहेत.

त्यातलाच एक समुदाय म्हणजे जैन समुदाय. हे लोक शाकाहारी तर आहेतच परंतु त्याच सोबत त्यांच्या जेवणाची एक खासियत आहे. ते आपल्या जेवणात कांदा-लसूण, आलं  घालत नाहीत.परंतु संपूर्ण जगभरात त्यांचं हे जेवण मिळतं. अनेकदा आपण पाहतो की अनेक शाकाहारी हॉटेल्समध्ये देखील जैन पदार्थ मिळतील असं लिहिलेलं असतं.एकवेळ मांसाहार न करणं समजू शकतं. हिंदू धर्मातही चातुर्मास पाळला जातो. ज्यामध्ये श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांमध्ये मांसाहार, कांदा आणि लसूण वर्ज्य असतो.अर्थातच यामागचं कारण आहे ते म्हणजे श्रावण चालू होताना पावसाला सुरुवात झालेली असते, त्यामुळेच हवेत विविध प्रकारच्या बॅक्टेरिया, विषाणू यांचे प्रमाण वाढलेले असते.तसेच कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसी समजले जातात. त्यामुळे पावसाळ्यात अपचन, अजीर्ण आणि कफ यासारखे विकार वाढत असतात.परंतु कांदा, लसूण, आले, गाजर, बटाटा, फ्लॉवर मोड आलेली कडधान्य न घेता स्वयंपाक करायचा म्हणजे खरंतर किती कठीण काम!


आणि जैन समुदायातील काहीजण आयुष्यभर या गोष्टी खात नाहीत. अर्थातच या सगळ्यामागे एक विशेष कारण आहे. आणि ते म्हणजे जैन धर्मीयांना कुठल्याही प्रकारची हिंसा मान्य नाही.

मुळातच अध्यात्म आणि अहिंसा या तत्त्वावरच या धर्माची स्थापना झाली आहे. अहिंसा हे तत्व असल्यामुळे जैन समुदायात मांसाहार करण्याचा प्रश्नच येत नाही.जैन मंदिरांमध्ये देखील ‘अहिंसा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य लिहीलेलं असतं. म्हणूनच अहिंसा ही त्यांच्या जेवणात देखील दिसून येते.या अहिंसेचे पालन ते खुपच जाणीवपूर्वक आणि मनापासून करतात. अगदी जैन मुनि ही तोंडावर पांढरं फडकं लावून फिरताना आपण पाहतो. याचं कारण आहे तेच आहे की सूक्ष्मजीव जंतू तोंडात जाऊ नयेत.एखादा सूक्ष्मजीव जंतू देखील मारला जाऊ नये याची ते काळजी घेतात. म्हणूनच जमिनीच्या खाली येणारे कांदा-लसूण, आलं ,गाजर ,मुळा अशा गोष्टी ते खात नाहीत.  याचं कारण पण ते जमिनीतून बाहेर काढताना त्या वरती असणारे सूक्ष्मजीव किडे, मुंग्या मरून जातात. तिथला तो छोट्या जीवांचा अधिवास नष्ट होतो असं ते मानतात.

म्हणूनच जैनधर्मीय स्ट्रीक्टली या गोष्टी खात नाहीत. तसेच कांदा आणि लसूण या तामसिक गोष्टी आहेत. तमस म्हणजे अंधार. म्हणजेच या गोष्टी खाल्ल्याने कामवासना जागृत होते आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करता येत नाही, असं ते मानतात.

खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळापासूनच जैन लोक पाणीदेखील गाळुन पितात. याचं कारण पाण्यातलेही इतर काही जीवजंतू असतील तर ते मारले जाऊ नयेत.

ते पाणी भरण्याची देखील एक पद्धत होती. आधीच्या काळी नदी, विहीर, आड या मधून पाणी घ्यावं लागायचं. ते घागरीने किंवा कळशीने घेतलेले पाणी दुसर्‍या भांड्यात ओतताना त्या भांड्यावर कापड ठेवलं जायचं, जेणेकरून पाणी गाळून घेतलं जाईल.नंतर ते कापड उलट्या बाजूने पाणी घालून विहिरीत किंवा आडात ते पाणी सोडलं जायचं. ज्यामुळे कापडात अडकलेले जीवजंतू आपल्या मूळ ठिकाणात परत जातील.


कुठल्याही वनस्पतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी देखील जैन धर्मीय काळजी घेतात. अगदी मोड आलेली कडधान्य देखील ते खात नाहीत.याचं कारण पण तेच आहे की मोड येताना नवीन अंकुर फुटतो आणि आपण त्याचं जगणं नष्ट करतो असं ते मानतात.

जैन धर्मीय मधही खाणं टाळतात. कारण त्यामध्ये देखील मधाच्या पोळ्यावरच्या माशा उडवल्या जातात, म्हणजेच माशांचं निवासस्थान नष्ट होतं.

काहीजण फ्लॉवर, वांगी आणि पेरू देखील खात नाहीत. कारण त्यामध्ये ही छोटेसे किडे असतील तर ते चुकून खाल्ले जाण्याची शक्यता असते.


रात्री उरलेलं अन्नही ते खात नाहीत. मुळात जैनधर्मीय रात्रीचे जेवण सूर्य मावळायच्या वेळेसच करतात. जे लोक कट्टरपणे या पद्धतीचा अवलंब करतात ते सूर्य मावळल्यावर रात्रीचे जेवण करत नाहीत.

याचं कारण देखील तेच आहे, पूर्वी रात्री लाइट्स नव्हते खूप अंधार असायचा, त्यात दिव्याभोवती किडे जमा व्हायचे आणि काही त्या उष्णतेमुळे मरून जायचे.

जैन धर्माचा इतिहास सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.

CLICK HERE